Wednesday, March 22, 2017

काँग्रेस + डावे = भाजप


संघाच्या कृपेने त्यांच्याकडे डाव्यांसारखेच तळागाळापर्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत

गिरीश कुबेर | March 19, 2017 3:59 PM

एकेकाळी कॉंग्रेस हा सत्तावादी पक्ष होता. येनकेन प्रकारेन सत्ता मिळवायची आणि ती टिकवून ठेवायची, या तत्त्वावर चालणारा. आज भाजपही तेच करतो आहे. भ्रष्टाचारी आणि गुंडांना पावन करून घेत, वर त्याचे समर्थन करण्याचे धारिष्टय़ भाजपवाले दाखवीत आहेत. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये असलाच तर एकच फरक आहे, तो म्हणजे संघाच्या कृपेने त्यांच्याकडे डाव्यांसारखेच तळागाळापर्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत. जे कॉंग्रेसमध्ये सुरुवातीचा काही काळ सोडला तर कधीच नव्हते आणि नाहीत. तशात भाजपने कॉंग्रेसची गरीबकल्याणाची दांभिक भाषाही चलाखीने आत्मसात केली आहे. आणि या भाषेला भुलणाऱ्या भाबडय़ा जनतेची आपल्याकडे कधीच कमतरता नव्हती- आणि नाही. भाजपच्या ताज्या यशाचे हे खरे गमक आहे.

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेक भ्रष्टाचारी, गुंड आदींना भाजपने आसरा देऊन पावन करून घेतले होते. स्वच्छ प्रतिमेसाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी या मंडळींचे वर्णन करताना एक मार्मिक शब्दप्रयोग केला होता.

‘माजी गुंड’ हा तो शब्दप्रयोग! ही मंडळी वादग्रस्त आहेत, गुंड आहेत, हे फडणवीस यांना मान्य होते. परंतु त्यांच्या मते, तो त्यांचा भूतकाळ होता. ज्या अर्थी भाजपने त्यांना स्वीकारले आहे, त्या अर्थी वाल्याचा वाल्मिकी होतो त्याप्रमाणे हे सर्व शुचिर्भूत झाले आहेत असे जनतेने मानावे, हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत- त्यातही विशेषत: उत्तर प्रदेशात- भाजपने जी डोळे दिपवणारी कामगिरी नोंदवली त्यामागे हा सत्ताग्रही नवनैतिकवाद आहे. सध्याच्या सत्योत्तर काळात हा नवनैतिकवाद हे भाजपचे वास्तव असून, एकेकाळी काँग्रेसने ज्याप्रमाणे त्याकाळच्या नवनैतिकवादास जन्म दिला होता, त्याचे हे नरेंद्र मोदीकालीन स्वरूप. त्याकाळी कोणत्याही विचारधारेच्या व्यक्तीस आपल्यात घोळवून आपल्याच पक्षाचा चेहरा त्या व्यक्तीस देण्यात काँग्रेसने नैपुण्य मिळवले होते. सांप्रत काळी भाजपचा प्रवास त्याच दिशेने सुरू आहे. भाजपच्या ताज्या विजयाचा अर्थ लावताना हा मुद्दा समजून घ्यायला हवा.

एकेकाळी काँग्रेस हा पक्ष भिन्न भिन्न विचारधारेच्या निवडून येणाऱ्या नेत्यांचा समूह होता. त्यात डावीकडे झुकणारे, किंबहुना- कडवे डावे मोहन कुमारमंगलम् वगैरे जसे होते त्याचप्रमाणे कडवे उजवे वल्लभभाई पटेल यांच्यासारखेही अनेक होते. समाजवाद्यांचा तर भरणाच होता त्यावेळी काँग्रेसमध्ये. हा काहीएक वैचारिक बांधिलकी मानली जाण्याचा काळ. पुढे सत्तेस सरावल्यानंतर अणि सत्तेची चटक लागल्यानंतर विचारधारांचा एकेक पदर काँग्रेसच्या खांद्यावरून गळत गेला आणि शेवटी एकाच विचारधारेने हा पक्ष बांधला गेला..

सत्तावाद!

या सत्तावादाचे वर्णन ‘सत्तेचा ध्रुवतारा डोळ्यासमोरून हलू द्यायचा नाही!’ असे करता येईल. मग अब्दुल गनीखान चौधरी यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्यास पोसावे लागले तरी हरकत नाही, मुस्लीम लीगसारख्या कडव्या धर्मवादी पक्षाशी शय्यासोबत करावी लागली तरी हरकत नाही, आपल्या राजकीय प्रतिस्पध्र्याना रोखण्यासाठी भिंद्रनवाले नावाचा भस्मासुर पोसावा लागला तरी हरकत नाही, अयोध्येच्या वादग्रस्त भूमीतील राममंदिराचे दरवाजे उघडावे लागले तरी पर्वा नाही, वगैरे वगैरे अनेक दाखले देता येतील.. पण सत्ता मिळवायचीच, हे काँग्रेसचे एकमेव ध्येय होते. आणि ते सातत्याने साध्य करण्यातील यशाने त्यास त्या विषयात नैपुण्य मिळाले होते. काँग्रेसच्या या यशास भुलून अनेक सत्तेच्छुक भुंगे या पक्षात येत गेले आणि काँग्रेस त्यांचे स्वागत करीत गेला. काँग्रेसने सर्वपक्षीय वादग्रस्तांना पावन करून घेतले. काँग्रेसवासी झाले की त्यावेळच्या प्रथेप्रमाणे आपोआपच ते निधर्मी गणले जात असत. फरक असलाच तर इतकाच, की आताच्या भाजपप्रमाणे काँग्रेसने त्यांचे वर्णन कधी ‘माजी धर्माध’ वा ‘माजी गुंड’ असे केले नाही.

प्रत्येक पुढची पिढी ही सर्वच बाबतींत मागच्या पिढीपेक्षा अधिक धीट असते. राजकीय पक्षही यास अपवाद नसतात. त्यामुळे काँग्रेसला त्यावेळी आपल्या सत्तावादी धोरणांचे हे असे समर्थन करणे जमले नाही. पण भाजपने ते करून दाखवले. गेल्या काही महिन्यांत झालेल्या निवडणुका हे त्याचे उदाहरण. या निवडणुका मग महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या असोत वा उत्तर प्रदेश विधानसभेच्या. भाजपने निवडून येऊ शकतील अशा निवडकांना आपले म्हणण्याचा सपाटा लावलेला दिसतो तो याच सत्तावादाच्या साक्षात्कारामुळे. एकेकाळी पप्पू कलानी यांच्यासारख्यांना काँग्रेसमध्ये घेतले म्हणून आकाशपाताळ एक करणारा भाजप ज्याप्रमाणे त्याच पप्पू कलानीशी सत्तासोबत करू शकला, त्याचप्रमाणे बहुजन समाज पक्षाच्या केशव प्रसाद मौर्य यांनाही भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले म्हटले. इतकेच नाही, तर त्यांच्या हाती उत्तर प्रदेश राज्याची धुरादेखील दिली. असे विविध राजकीय पक्षांतील जिंकू शकतील असे अनेक महत्त्वाचे मोहरे भाजपने ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, त्या त्या ठिकाणी वेचून वेचून टिपले. अमित शहा यांच्या नव्या बेरजेच्या राजकारणाचा हा परिपाक. एकेकाळी काँग्रेस हे

असे बेरजेचे राजकारण करीत असे. परंतु एकापाठोपाठ एक अशा अनेक ठिकाणच्या सत्तांतून काँग्रेसची वजाबाकीच होत गेली. वजाबाकीची प्रक्रिया सुरू असताना बेरीज करता येत नाही. ती करण्यासाठी एका कोणत्या तरी अंकावर थांबावे लागते. असे थांबणे काँग्रेसला अजून जमलेले नाही. दरम्यान, भाजपला हा बेरजेच्या राजकारणाचा मूलमंत्र गवसला आणि हे समीकरण त्या पक्षाने आत्मसात केले.

परिणामी भाजप आज एकेकाळच्या काँग्रेसप्रमाणे ऐन हमरस्त्यातला पक्ष बनला असून, ज्याप्रमाणे महामार्गावरून जाणारी बस अधिक प्रवासी आकर्षित करते, त्याप्रमाणे अन्य राजकीय पक्षांतील विविध प्रवासी भाजप आकृष्ट करू लागला आहे. या दोन पक्षांतील साम्य येथेच संपणारे नाही. आणखी एक महत्त्वाचे साम्य या दोन पक्षांत आहे.

उजव्यांचे भले करायचे, उजवीकडे पाहायचे; परंतु भाषा सातत्याने डावी करायची, डावीकडे पाहायचे, हे काँग्रेसचे आर्थिक धोरण राहिलेले आहे. भाजप बरोब्बर तसेच करताना दिसतो. सत्ता हाती आल्यावर लवकरच हे डावीकडे पाहण्याचे महत्त्व भाजपच्या ध्यानी आले. ‘सूट-बुट की सरकार’ या राहुल गांधी यांनी केलेल्या एकाच आरोपातून भाजपला दिशा सापडली. या देशात गरिबीची भाषा केल्याखेरीज आपला राजकीय खुंटा बळकट करता येणार नाही, हे सत्ताकारणाचे मर्म आहे.

ते म्हणजे आर्थिक! उजव्यांचे भले करायचे, उजवीकडे पाहायचे; परंतु भाषा सातत्याने डावी करायची, डावीकडे पाहायचे, हे काँग्रेसचे आर्थिक धोरण राहिलेले आहे. भाजप बरोब्बर तसेच करताना दिसतो. सत्ता हाती आल्यावर लवकरच हे डावीकडे पाहण्याचे महत्त्व भाजपच्या ध्यानी आले. ‘सूट-बुट की सरकार’ या राहुल गांधी यांनी केलेल्या एकाच आरोपातून भाजपला दिशा सापडली. या देशात गरिबीची भाषा केल्याखेरीज आपला राजकीय खुंटा बळकट करता येणार नाही, हे सत्ताकारणाचे मर्म आहे. इंदिरा गांधी यांना जसे ते गवसले, तसेच ते पश्चिम बंगालात ज्योती बसू आदींनाही उमगले. पश्चिम बंगालातले एक बुद्धदेव भट्टाचार्य वगळता एकजात सर्व डावे हे एका अर्थी वागण्यात कडवे उमरावच होते. सुस्नात कोरे करकरीत धोतर, वरती तितकाच शुभ्र कुडता, एका हातात फ्रेडरिक फोर्सिथ याचे ‘फिस्ट ऑफ गॉड’ आणि दुसऱ्या हातात स्कॉचचा ग्लास असे ज्योतीबाबूंचे प्रस्तुत लेखकाने मुंबईतील अतिआलिशान सप्ततारांकित हॉटेलात घेतलेले दर्शन अजूनही डोळ्यासमोर आहे. त्यांच्या डावेपणाच्या या दिलखेचक दर्शनाने त्यावेळी बसलेला उजवा धक्का पचवायला किती काळ जावा लागला होता याचेही अजून स्मरण आहे. त्यानंतर काँग्रेसमधील डाव्या नाही, पण समाजवादाचा बुक्का लावणाऱ्या अनेकांची भांडवलशाही वृत्ती पुढे अनेकदा अनुभवता आली. तरीही या सर्वाच्या गरीब- कल्याणाच्या भाषेचा सुरुवातीला धक्का बसायचा. नंतर हा विरोधाभास अंगवळणी पडला. भाजपने ही चूक वेळीच सुधारली. त्यामुळे पंगतीला अंबानी, अदानी असले तरी हरकत नाही, सर्व धोरणे त्यांच्या भल्याचीच असली तरी हरकत नाही; पण भाषा मात्र गरीबकल्याणाचीच असायला हवी, हे भाजपला लवकरच उमगले. त्याचमुळे उद्योगस्नेही अशा जमीन हस्तांतरण कायद्याचा प्रयत्न या सरकारने लगेचच सोडला. त्यात सर्वसमावेशक राजवट आणि कार्यक्षम कारभार असूनही २००४ साली अटलबिहारी बाजपेयी यांना पत्करावा लागलेला पराभव भाजपसमोर होताच. त्यावेळी ‘शायनिंग इंडिया’ या एकाच घोषणेने भाजपचा घात केला. ती चूक विद्यमान भाजपला टाळायची होती. ती त्यांनी टाळली.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे निश्चलनीकरणाच्या निर्णयाला नरेंद्र मोदी यांनी यशस्वीपणे फासलेला गरीबकल्याणाचा चुना. हजार, पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्याने काळा पैसा नष्ट होऊन जणू गरीबांचे कल्याणच होणार आहे, ही कथा मोदी यांनी इतक्या उत्तमपणे या देशातील भाबडय़ांच्या गळी उतरवली, की त्यांच्या विक्रीकौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मुदलात या देशातल्या बहुसंख्य जनतेचे आर्थिक ज्ञान बेतासबात. त्यात गरीब, पिछडे वगैरे भाषा केली की हा वर्ग हमखास भुलतो, हे ऐतिहासिक सत्य. या सत्याच्याच वास्तवदर्शी जाणिवेने गरीब, पिछडय़ांची भाषा करणाऱ्या मायावती धनाढय़ांनाही लाजवतील असे श्रीमंती आयुष्य जगू शकतात; आणि याच सत्याच्या अंगीकारामुळे मोदींची नोटाबंदीची नजरबंदी बहुसंख्यांना आंधळी करते. गरीब आणि श्रीमंत यांतील दरी वाढवणे आणि आपल्या निर्णयांमुळे श्रीमंतांच्या पोटाला चिमटा बसत असल्याचे वातावरण निर्माण करणे, हे आपल्याकडे हमखास राजकीय यशामागील सूत्र असते. संस्थानिकांचे तनखे बंद, बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि त्यावर ‘गरिबी हटाव’ ही दिलखेचक घोषणा यामुळे इंदिरा गांधी बराच काळ यशस्वी ठरल्या. जनधन, निश्चलनीकरण आदींमुळे मोदी यशस्वी ठरत आहेत. या अशा भुलवणाऱ्या यशाची पुनरावृत्ती का होते, यामागे एक महत्त्वाचे कारण आहे.

ते म्हणजे- या देशात संपत्तीनिर्मितीला महत्त्व नाही. त्यामुळे गरिबीचे उदात्तीकरण आणि ती हटवण्याची भाषा यांस महत्त्व येते. त्याचमुळे ‘गरिबी हटाव’ ही नकारात्मक घोषणा या देशातील सर्वात लोकप्रिय घोषणा ठरते. आणि त्याचमुळे काळा पैसा हटवण्याची भाषा आजही आकर्षक ठरते. म्हणजेच काहीतरी निर्माण करण्यास महत्त्व देण्यापेक्षा काहीतरी हटवणे हे आपल्याकडे अधिक फलदायी ठरते- हे ऐतिहासिक सत्य आहे. मोदी यांना ते लवकरच उमगले. त्याचमुळे कोणत्याही लक्षणीय आर्थिक सुधारणा, निर्गुतवणूक आदी न करता निश्चलनीकरण हेच या सरकारचे मोठे आर्थिक भाष्य.. ‘स्टेटमेंट’ या अर्थाने.. होते. मोदी आणि त्यांचे आंधळे भक्त म्हणतात त्याप्रमाणे हे निश्चलनीकरण इतके प्रभावी अस्त्र असते तर त्यानंतरच्या सर्व निवडणुकांत पैशाचा असा नंगा नाच दिसता ना! निवडणूक आयोगाचीच आकडेवारी दर्शवते की, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत किमान तिप्पट रोकड पकडली गेली. तीदेखील निश्चलनीकरण ताजे असताना. हा सर्व पैसा पांढराच आहे, यावर विश्वास ठेवणे हे आंधळ्या भक्तांचे प्राक्तन असेल; परंतु किमान विचारी जनांनी तरी या सत्यापलापाकडे का दुर्लक्ष करावे? विद्यमान वातावरणात या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा बाळगणे दूरच; परंतु हा प्रश्न विचारणेदेखील धाष्टर्य़ाचे ठरते. तेव्हा या सर्व दाखल्यांवरून भाजप हा नवा काँग्रेस पक्ष ठरतो, हे मान्य व्हावे. तथापि जे काँग्रेसकडे नव्हते अािण डाव्यांकडे होते, ते सध्याच्या भाजपकडे आहे.

भाजपाच्या यशाचे मोठे श्रेय जाते ते निश्चलनीकरणाच्या निर्णयाला नरेंद्र मोदी यांनी यशस्वीपणे फासलेल्या गरीबकल्याणाच्या चुन्याला. हजार, पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्याने काळा पैसा नष्ट होऊन जणू गरीबांचे कल्याणच होणार आहे, ही कथा मोदी यांनी इतक्या उत्तमपणे या देशातील भाबडय़ांच्या गळी उतरवली, की त्यांच्या विक्रीकौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मुदलात या देशातल्या बहुसंख्य जनतेचे आर्थिक ज्ञान बेतासबात. त्यात गरीब, पिछडे वगैरे भाषा केली की हा वर्ग हमखास भुलतो, हे ऐतिहासिक सत्य.

कार्यकर्त्यांचे बळ. काँग्रेस हा त्या अर्थाने कधीच कार्यकर्ताधारित.. म्हणजे काडरबेस्ड.. पक्ष नव्हता. एका कुटुंबाभोवती फिरणाऱ्या तगडय़ा नेत्यांच्या मध्यवर्ती नेतृत्व मंडळाने निवडणुका जिंकून द्याव्यात आणि त्यातून मिळालेल्या सत्तेतून खालच्या पायरीवरील अनेकांच्या शिध्याची व्यवस्था करावी- अशी या पक्षाची रचना. वरून खाली असे जोपर्यंत शिधावाटप होत होते तोपर्यंत ही उतरंड व्यवस्था उत्तम चालली. कालौघात ही व्यवस्था जसजशी अशक्त होत गेली, तसतसे तळाच्या पायऱ्यांतील लाभदायी काँग्रेसला सोडून जाऊ लागले. तसेही ते काही कोणत्या विचारधारेने त्या वळचणीखाली जमले होते असे नाही. त्यांच्या जमण्यामागे वरून मिळणारा शिधा हे एकमेव बांधून ठेवणारे कारण होते. शिधावाटप संपल्यावर या तळाच्या मंडळींना बांधून ठेवणारा घटकच नाहीसा झाला.

मग हा वर्ग भाजप आदी पक्षांकडे आकृष्ट होऊ लागला. भाजपने त्यांना सामावून घेतले. पण त्याचवेळी भाजपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून बांधल्या गेलेल्या कार्यकर्त्यांचा जथ्थाचा जथ्था तयार होता. हा संघीय जथ्था डाव्या पक्षांकडे असणाऱ्या कार्यकर्त्यांइतकाच तगडा, बांधीव होता. त्यांच्या जोडीला भाजपत हा अन्यपक्षीय कार्यकर्त्यांचा घोळका जमा होऊ लागल्यावर या पक्षाच्या आणि मूळ पिठाच्या- म्हणजे संघाच्या शीर्षस्थ नेत्यांनी दोघांची एक मोट बांधली. काँग्रेसच्या कथित निधर्मीवादाला भुलून दलित, मुसलमान, अल्पसंख्य आदी त्या पक्षाकडे वळले होते. भाजप आणि संघाने मग माळी, धनगर आदी अन्य मागासांना.. म्हणजे ओबीसींना.. आपल्याकडे वळवले. कल्याणसिंह, गोपीनाथ मुंडे, उमा भारती ते नरेंद्र मोदी ही ओबीसी नेत्यांची फळीच्या फळी त्या पक्षात तयार झाली, त्यामागचे हे कारण.

काँग्रेस आणि भाजप यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे हे या पक्षाने ठरवून केले. काँग्रेसला हे जमले होते ते सत्तास्थानामुळे. परंतु या अशा बांधून ठेवायच्या कार्यकर्त्यांचे महत्त्व काँग्रेसने कधीच लक्षात घेतले नाही. त्यामुळे संघटनात्मक बांधणी अशी त्या पक्षाची कधीच झाली नाही. या बांधणीचे महत्त्व ओहोटी लागली की कळते. ज्या वेळेस भरती असते त्यावेळी काहीही न करणाऱ्या निष्क्रियांची नावदेखील आपोआप उचलली जाते. प्रश्न ओहोटीच्या वेळचा असतो. तो आता काँग्रेसला भेडसावत आहे. हमखास निवडून देणारे नेतृत्व असले तर मतदान केंद्रनिहाय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे महत्त्व जाणवत नाही. ते जाणवते हमखास निवडून देण्याची क्षमता असणारे नेते काळाच्या पडद्याआड गेल्यावर! परंतु तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आणि एव्हाना जे काही जमलेले तळाचे कार्यकर्ते असतात, तेदेखील सोडून गेलेले असतात. डाव्यांकडे, काँग्रेसकडे आज काही ठिकाणी नेते आहेत, तर तळाचे कार्यकर्ते नाहीत. तर काही ठिकाणी तळाचे कार्यकर्ते आहेत, पण नेते नाहीत असे चित्र आहे. भाजप तूर्त हे दोन्हीही राखून आहे. त्याचमुळे सध्याचा भाजप हा काँग्रेसचे धर्मवादी स्वरूप आणि डाव्यांचे संघटनकौशल्य यांचे मिश्रण ठरतो.

तर असे हे सध्याचे आपले राजकीय वास्तव आहे. भारतीय जनतेचा उत्कलन बिंदू बराच वरचा आहे. त्यामुळे या जनतेचा भ्रमनिरास व्हायला बराच वेळ लागतो. गेल्या सत्तर वर्षांत यात काही फार फरक झालेला आहे असे नाही. या निवडणुकांनी हेच वास्तव दाखवून दिले आहे.

गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

आता निघायला हवे..


जवळच्या मित्रमंडळांत त्यांचा उल्लेख लॉर्ड गोविंदराव असा केला

लोकसत्ता टीम | March 23, 2017 4:13 AM

गोविंदराव तळवलकर

मराठीचे भाषासौष्ठव जपणाऱ्या गोविंदराव तळवलकरांकडे भाषिक मर्यादा ओलांडून जाण्याची क्षमता होती आणि त्या त्यांनी ओलांडल्याही..

जवळच्या मित्रमंडळांत त्यांचा उल्लेख लॉर्ड गोविंदराव असा केला जाई इतके ते विचाराने पाश्चात्त्य. परंतु अमेरिका, ब्रिटन आणि अर्थातच भारत आदी ठिकाणच्या वाढत्या असहिष्णुतेने ते अस्वस्थ होत. जगभरातली बदलती राजकीय संस्कृती हा त्यांच्या चिंतेचा विषय होता आणि ते ती चिंता उघडपणे व्यक्त करीत. भारतातील अलीकडच्या निवडणुका आणि नंतरच्या काही राजकीय नेमणुका ही त्यांची शेवटची वेदना. या बदलत्या राजकीय विचारधारेशी जुळवून घेणे त्यांना दिवसेंदिवस अशक्यप्राय वाटू लागले होते.

गोविंदराव तळवलकरांचे आकाश मराठी वर्तमानपत्रांच्या चौकटीत मावेल इतके लहान नव्हते. करकरीत बुद्धिवादी आणि अभिजात सौंदर्यवादी, या बुद्धिवादास साजेशी प्रसंगी कोरडी वाटेल अशी भाषाशैली आणि तरीही उत्तमोत्तम काव्याचा आनंद घेण्यादेण्याइतके हळुवार, जे जे हिणकस, सपक, क्षुद्र असेल त्याचा समाचार घेताना लेखणीने रक्तबंबाळ करण्याची क्षमता आणि तरीही कमालीचे उदारमतवादी हे गोविंदरावांचे लेखनवैशिष्टय़. परंतु केवळ एवढय़ातूनच त्यांच्या मोठेपणाचा परिचय करून देता येणार नाही. ज्या काळात सर्वसाधारण मराठी संपादक साहित्य संमेलनांतील उचापती, वैयक्तिक उणीदुणी, एखाद्या सामाजिक मुद्दय़ाची भावोत्कट मांडणी आदी ग्रामोद्योगांत मग्न होते त्या काळात गोविंदराव मराठी वाचकांना आंद्रे साखारॉव्ह, बोरीस पास्तरनाक, आर्थर कोस्लर, स्टीफन झ्वेग अशा एकापेक्षा एक पाश्चात्त्य रत्नलेखनाची ओळख करून देत. गोविंदराव त्या अर्थाने त्या काळचे आणि त्या वातावरणातलेही नव्हते. त्यामुळे ह. रा. महाजनी, विद्याधर गोखले, दि. वि. गोखले, अनंतराव भालेराव, रंगा वैद्य असे मोजकेच काही सोडले तर गोविंदरावांनी जवळीक साधावी असे तत्कालीन मराठी पत्रकारितेत फार कोणी त्या वेळी नव्हते. त्यामुळे शामलाल, गिरिलाल जैन, निखिल चक्रवर्ती, एन. राम अशा राष्ट्रीय स्तरावरील संपादकांतच ते अधिक रमत. समृद्ध वाचनाने आलेल्या बौद्धिक श्रीमंतीचा गोविंदरावांना अभिमान होता आणि त्यामुळे अशा जातीच्या रावबहादुरी उमरावासारखेच त्यांचे वागणे असे. लोकप्रिय होण्याचा सोस नाही आणि कोणास काय वाटेल याची पत्रास ठेवण्याचे कारण नाही, असा त्यांचा खाक्या. त्याचमुळे फुटकळ मालिका आदी लिहिण्यात धन्यता मानणाऱ्या आणि लेखनबाह्य़ उचापतींसाठीच ओळखल्या जाणाऱ्या संपादकासमवेत व्यासपीठावर बसण्यास त्यांनी नकार दिला होता आणि दुसऱ्या एका संपादकाच्या बहुचर्चित ग्रंथाचे वर्णन त्यांनी ‘बालवाङ्मय’ असे केले होते.

मराठीस बुद्धिवादाची एक समृद्ध परंपरा आहे. गोविंदरावांच्या रॉयवादामुळे या परंपरेस वेगळीच धार आली. त्या वेळी महाराष्ट्रात मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तर्कवादाचे पाईक असे अनेक थोर होऊन गेले. ह. रा. महाजनी, गोविंदभाई परिख, इंदुमती परिख, व्ही. एम. तारकुंडे आणि अशा सगळ्यांचे अग्रणी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे गोविंदरावांचे निकटवर्ती. ही एकापेक्षा एक व्यासंगी मंडळी. तर्ककठोरता हा त्यांच्या विचारांचा गाभा. कोणत्याही विषयाचे विश्लेषण करावयाचे ते भावनेस चार हात दूर ठेवून हे या सगळ्यांचेच वैशिष्टय़. गोविंदरावांत हे गुण संपादक या नात्याने पुरेपूर मुरलेले होते. त्यामुळे विषय आंतरराष्ट्रीय असो की राष्ट्रीय. वॉटरगेटसारखे प्रकरण असो की आचार्य विनोबा भावे यांच्यासारख्या आदर्शाच्या वर्तनाची चिकित्सा असो. गोविंदरावांच्या बुद्धिवादास भावनेने कधीही आडकाठी आणली नाही. त्याचमुळे आणीबाणीची भलामण करणाऱ्या आचार्य विनोबा भावे यांचा समाचार गोविंदराव ‘सूक्ष्मातील विनोबा, स्थूलातील आपण’ अशा अग्रलेखाद्वारे घेऊ शकले. रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांनी संघाच्याच ऑर्गनायझर साप्ताहिकात समान नागरी कायद्यास विरोध करणारी मुलाखत दिली. गोविंदरावांनी त्यावर भाष्य करताना तत्कालीन सरसंघचालकांना ‘लीगबंधू गोळवलकर’ असे संबोधले. सत्तरच्या दशकात दलित चळवळ हा मोठा नाजूक आणि प्रक्षोभक विषय होता. देशात दलितांविरोधात काहीही घडले की त्याचे पडसाद सर्वदूर उमटत आणि समस्त दलित आणि त्यांना सहानुभूती देणारे नेतृत्व समाजास वेठीस धरत असे. दलित लेखक, नेते यांच्यावर टीका करणे हे त्या वेळी जवळपास दुरापास्तच होते. परंतु गोविंदरावांनी त्या विषयावर ‘सत्याग्रह की आततायीपणा?’ असा थेट प्रश्न विचारण्याचे धाडस त्या वेळी दाखवले. यातील अनेक व्यक्ती गोविंदरावांच्या व्यक्तिगत स्नेहातील होत्या. परंतु हा व्यक्तिगत स्नेह गोविंदरावांच्या व्यावसायिक कर्तव्याच्या आड कधीही आला नाही. रामराव आदिक वा देवकांत बारुआ यांच्यावरील गोविंदरावांचे अग्रलेख याचे उदाहरण ठरावे. आदिक हे वैयक्तिक आयुष्यात गोविंदरावांचे चांगले मित्र होते. परंतु जर्मनीतून परतताना विमानात रामराव आदिक यांच्या हातून काही नको ते घडले. त्याचा इतका कडवा समाचार गोविंदरावांनी घेतला की आदिक यांच्या शत्रूसदेखील हे साध्य झाले नसते. बारुआ यांचेही तसेच. या माणसाचा ग्रंथसंग्रह अचंबित करणारा होता आणि ते गोविंदरावांच्या ग्रंथस्नेही वर्तुळातील होते. परंतु काँग्रेसप्रमुख या नात्याने बारुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ असे लांगूलचालनी विधान केले आणि गोविंदरावांनी त्यांना झोडपले. परंतु आपल्या ग्रंथविषयक पुस्तकात याच बारुआ यांच्या महाप्रचंड ग्रंथसंग्रहाविषयी त्यांनी कौतुकानेही लिहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील त्यांच्या वैयक्तिक स्नेहींपैकी. इतके की १९९५ साली सेना भाजपची सत्ता आली असता बाळासाहेबांनी मुख्यमंत्री कोणास करावे यावर गोविंदरावांशी चर्चा केली होती. परंतु म्हणून सेनेच्या राजकारणावर कोरडे ओढताना गोविंदरावांनी कधीही हात आखडता घेतला नाही.

हे त्या काळचेच एका अर्थाने वैशिष्टय़. अलीकडे ज्याचा उच्चार शिवीसारखा केला जातो त्या उदारमतवादी, म्हणजेच लिबरल, विचार घराण्याचे गोविंदराव पाईक. या मुद्दय़ावरही गोविंदरावांचा परीघ हा त्या वेळच्या मराठी संपादकांपेक्षा किती तरी मोठा होता. मिनू मसानी, नानी पालखीवाला, बॅ. तारकुंडे अशी अनेक एकापेक्षा एक मातबर मंडळी त्यांना कार्यालयात भेटावयास येत. वास्तविक हे आणि असे सर्वच मराठी वाचक असण्याची शक्यता कमीच. परंतु या भाषिक मर्यादा ओलांडून जाण्याची क्षमता गोविंदरावांत होती आणि त्या त्यांनी ओलांडल्याही. आणीबाणीच्या काळात भूमिगत असताना जॉर्ज फर्नाडिस काही काळ गोविंदरावांच्या घरी राहिले होते. एस. एम. जोशी, मधु लिमये, मधु दंडवते असे अनेक साथी गोविंदरावांच्या स्नेहवर्तुळातील. पण तरीही त्यांनी समाजवाद्यांची यथेच्छ टिंगल केली. आर्थिकदृष्टय़ा गोविंदराव उजवे होते परंतु सांस्कृतिकदृष्टय़ा ते डाव्यांत बसत. याचा अर्थ भांडवलशाही व्यवस्थेत समाजाचे भले आहे असे ते ठामपणे मानत आणि भांडवलशाही वर्तमानपत्रांचे संपादक म्हणून हिणवणाऱ्यांचा ते कठोर समाचार घेत. परंतु त्याच वेळी सांस्कृतिक आणि धार्मिक उजवेपण यांचा गोविंदरावांना कमालीचा तिटकारा होता. रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेले दि. वि. गोखले, सावरकरवादी विद्याधर गोखले,   स. ह. देशपांडे, म्हैसाळ प्रयोगकर्ते मधुकर देवल अशा अनेकांशी त्यांचा व्यक्तिगत संबंध होता. भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांच्याशीही त्यांचा चांगला दोस्ताना होता. परंतु असे काही सन्माननीय अपवाद वगळता उजव्यांच्या कर्कश, तर्कशून्य आणि मागास राजकारणाचे ते वाभाडे काढीत. या देशात मध्यममार्गी भूमिका घेतल्याखेरीज सर्वसमावेशक राजकारण करताच येणार नाही, असे ते मानत. विचाराने आधुनिक असलेल्या गोविंदरावांना नेहरूवादाचे आकर्षण नसते तरच नवल. पं. नेहरूंच्याही आधीचे मोतीलाल, चक्रवर्ती राजगोपालाचारी आदींच्या स्वराज पक्षाशी गोविंदरावांची वैचारिक नाळ जुळती होती. गोविंदराव कमालीचे नास्तिक होते आणि वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगांनीही त्यांना कधी देवभक्त वगैरे बनवले नाही. अमेरिकेत स्थायिक झाल्यावर अनेकांना देवधर्माचा पुळका येतो. गोविंदरावांचे शेवटपर्यंत तसे झाले नाही. आपण बरे आणि आपले वाचन बरे, असेच त्यांचे वर्तन होते. याचा अर्थ समाजात मिसळण्यास त्यांचा विरोध होता असे नाही. परंतु टवाळ्या करीत निर्थक हिंडणे त्यांना मंजूर नव्हते. जवळचे वैयक्तिक गुरू ह. रा. महाजनी, मित्र विद्याधर गोखले यांच्या आग्रहासाठी पिला हाऊसमध्ये विठाबाईची लावणी असो वा म्हैसाळ प्रकल्प असो. गोविंदरावांनी आवश्यक भेटीगाठीस कधीच नाही म्हटले नाही. अगदी अलीकडे अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्य़ूस्टन येथून ओहायोमधील क्लीव्हलँड येथे स्थलांतर करताना वाटेत वाकडी वाट करून गोविंदराव थॉमस जेफरसन यांचे घर आणि ग्रंथसंग्रह पाहण्यासाठी गेले. इतकी ज्ञानलालसा त्यांच्या ठायी होती.

हे त्यांचे आणखी एक वेगळेपण. गोविंदरावांसाठी संपादकपद हे नैमित्तिक होते. पण ग्रंथवाचनाचे तसे नाही. गोविंदराव पूर्णपणे ग्रंथोपजीवी. नगरपालिकेच्या शाळेत शिकून पुढे विविध क्षेत्रांत पांडित्य गाठणाऱ्यांची एक पिढी आपल्याकडे होऊन गेली. गोविंदराव त्या पिढीचे. शब्दश: शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे वाचन सुरू होते आणि नवनवीन पुस्तके मिळवून वाचण्याची त्यांची इच्छा कायम होती. वयाच्या नव्वदीत साधारणपणे आता काय राहिले आपले.. असा सूर असतो. गोविंदरावांच्या वाटय़ास तो सूर कधीही गेला नाही. भाषेविषयी कमालीचे संवेदनशील हे त्यांचे आणखी एक वैशिष्टय़. त्यांच्या अग्रलेखांच्या मथळ्यांवरून त्यांच्या भाषासौष्ठवाचा अंदाज यावा. ‘विचारवंतांचे योगवाशिष्ठ’, ‘ग्रंथपाल की शिशुपाल?’, ‘शालिनीबाईंची खंडणी’, ‘अखेर गाढव उकिरडय़ावर गेले’, ‘नमन नटवरा’, ‘कडा कोसळला’, ‘मोहिते यांचे जांभुळझाड’, ‘यशवंतराव वीसकलमे’, ‘पुण्यश्लोक नामजोशी’, ‘समाजवादी लक्षभोजने’ अशी किती उदाहरणे द्यावीत! या अशा संवेदनशील भाषाजाणिवेमुळे गोविंदराव स्वत:चे लेखन छापून येताना कमालीचे साशंक असत. भाषेची हेळसांड त्यांना खपत नसे आणि ते करणारी व्यक्ती त्यांच्या नजरेतून कायमची उतरत असे.

गोविंदराव आयुष्यभर पाश्चात्त्य उदारमतवादाचे पूजक राहिले. तेच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान. जवळच्या मित्रमंडळांत त्यांचा उल्लेख लॉर्ड गोविंदराव असा केला जाई इतके ते विचाराने पाश्चात्त्य होते. परंतु अमेरिका, ब्रिटन आणि अर्थातच भारत आदी ठिकाणच्या वाढत्या असहिष्णुतेने ते अस्वस्थ होत. जगभरातली बदलती राजकीय संस्कृती हा त्यांच्या चिंतेचा विषय होता आणि ते ती चिंता उघडपणे व्यक्त करीत. भारतातील अलीकडच्या निवडणुका आणि नंतरच्या काही राजकीय नेमणुका ही त्यांची शेवटची वेदना. या बदलत्या राजकीय विचारधारेशी जुळवून घेणे त्यांना दिवसेंदिवस अशक्यप्राय वाटू लागले होते. स्टीफन झ्वेग हा त्यांच्या आवडत्या लेखकांपैकी एक. सुरुवातीला अनेकांना आवडणारा राष्ट्रवाद पुढे कसा फॅसिस्ट वळण घेतो याचा तो भाष्यकार. हिटलरच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रसार पाहून तो ऑस्ट्रिया सोडून ब्रिटनच्या आश्रयाला जातो आणि एकंदरच नाझीवादाचा प्रसार पाहून अमेरिका आणि मग ब्राझीलमधे स्थलांतर करतो. तेथून युरोपकडे पाहताना वातावरणातील वाढती असहिष्णुता त्यास अस्वस्थ करते. या वातावरणात उदात्त आणि उदारमतवादी युरोपचे काय होईल या विचाराने त्यास इतके नैराश्य येते की तो आपले आयुष्य संपवतो. मृत्यूसमयी त्याने लिहून ठेवलेले पत्र वाङ्मयात अजरामर झाले आहे. ‘बौद्धिक आनंद आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा उपभोग घेता येत आहे, त्याच वेळी निघालेले बरे. आता वेळ झाली,’ हे झ्वेग याचे शेवटचे शब्द होते. एका अस्वस्थ क्षणी प्राण त्या थकलेल्या कुडीचा निरोप घेत असताना गोविंदरावांना झ्वेग आठवला असेल का? त्यांचा लाभलेला स्नेह सांगतो की या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल. या मनस्वी प्रकांड विद्वानास ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.